Breaking News

मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खुले पत्र

तोडफोडीवर मांडली भूमिका

मुंबई  : प्रतिनिधी
कोकणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होऊन एक मार्गिका सुरू होईल, तर डिसेंबर 2023अखेरपर्यंत संपूर्ण महामार्ग सुरळीतपणे सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. असे असताना काही विघ्नसंतोषींनी तोडफोडीचे सत्र अवलंबिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेला खुले पत्र लिहित या महामार्गाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पत्रात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे की, दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकल्यास विध्वंस होतो याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरू आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्रविरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.
जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो…? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक…? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहचलो, पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे… त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे…
मुंबई-गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टिपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरूच्चार करतो आणि डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण मुंबई-गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून… दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता, त्याऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामे करणारी तरुणाईची साथ हवी आहे… अवघ्या महाराष्ट्राला…
कोकणचा सुपुत्र म्हणून अनेक लहान-मोठ्या समस्या जवळून बघितल्या होत्या. यातल्या अनेक समस्यांचं मूळ मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेले चौपदरीकरण हेच आहे याचीदेखील जाणीव आहे. केंद्रात मोदीजी आणि राज्यात त्रिशुळ सरकार गतिमान पद्धतीने काम करीत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री या नात्याने पनवेल ते झाराप मुंबई-गोवा महामार्गावर कडक उन्हात आणि भर पावसात उतरून रस्ते कामाची सलग आठ वेळा पाहणी केलेला मी कोकणी माणूस आहे. भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे.
खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं ही स्वाभिमानी प्रतिज्ञा केली होती, ती कार्यसिद्धी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे व्रत म्हणून स्वीकारलं आहे.
या कामात असणार्‍या असंख्य अडचणी सोडवणं हे शिवधनुष्यच होतं, पण कार्यभार स्वीकारताच कोकणवासीयांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एकेक पाऊल उचलू लागलो. या कामातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. केवळ खड्डे न बुजवता सीटीबी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं फोडण्यापर्यंत या श्रेयजीवींची मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणार्‍या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरू असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशा प्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? हा प्रश्नच आहे. गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग पूर्ण करणारच या निश्चयातूनच आपला विभाग काम करीत आहे..
ज्या आदरणीय मोदीजींनी काश्मीरमधल्या दगडफेकू तरुणांच्या हाती रोजगार दिला तेव्हाच त्यांची अनेक दशकांची विनाशकारी विचारसरणी बदलली आणि बदलली काश्मीरची अर्थव्यवस्था… त्याचप्रमाणे मोदीजींचा कट्टर अनुयायी म्हणून एक दिवस हीच मंडळी तोडफोडप्रेमी, विनाशकारी विचारधारा सोडून कोकणच्या विकासाची आणि प्रगतीची विचारसरणी फॉलो आणि लाईक करतील ही आशा बाळगून आहे, असे शेवटी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply