Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात शांततेत मतदान; सोमवारी मतमोजणी

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 5) 177 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. सदस्यपदाच्या 3395 व सरपंचपदाच्या 485 अशा एकूण 3880 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. मतमोजणी सोमवारी (दि. 6) होणार आहे.
रायगडात 210 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी 33 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली, तर 177 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया झाली. 210 ग्रामपंचायतींच्या 1854 सदस्यांसाठी निवडणूक होणार होती. 44 जागांसाठी उमेदवारी अर्ज आले नाहीत. त्यामुळे या जागा रिक्त राहणार आहेत, तर 564 सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे 1246 सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले. सदस्यपदासाठी 3395 उमेदवार रिंगणात आहेत.
210 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची थेट जनतेतून निवड होणार आहे. चार ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे तेथील सरपंचपद रिक्त राहणार आहे, तर 38 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 168 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. याकरिता 485 उमेदवार रिंगणात आहेत.
सकाळी 7 .30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला मतदान संस्थागतीने सुरू होते. 7.30 ते 9.30 या पहिल्या दोन तासात 13.26 टक्के मतदान झाले होते. 11.30 वाजेपर्यंत 32.84 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडले. त्यामुळे काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. एकूण 86 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी मतमोजणी होणार आहे. त्या वेळी मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे स्पष्ट होईल.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply