उरण ः बातमीदार : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थानिक शेतकर्यांशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. सिडको मंडळाने गणेशपुरी व तरघर येथील प्रकल्पबाधितांना उलवा परिसरात दिलेल्या भूखंडाचा विकास करण्यासाठी हे प्रकल्पग्रस्त गेल्यावर तेथे इमारत बांधकामासाठी ‘आम्हालाच पुरवठा करण्याची संधी द्या अन्यथा विकसकाला तुडवू’ अशी भूमिका स्थानिक शेतकर्यांनी घेतल्याने हा पेच निर्माण झाला आहे.
नवी मुंबई पोलिसांनी या समस्येवर तोडगा काढावा यासाठी शेतकर्यांनी पोलीस उपायुक्त अशोक दुधे आणि सिडको मंडळाचे पुनर्वसन विभागाचे प्रमुख डॉ. संदीप माने यांची भेट घेऊन विनंती केली.
गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे या गावांमधील शेतकर्यांना सिडको मंडळाने विमानतळ प्रकल्पबाधित शेतकरी दर्जा देऊन त्यांना उलवे येथील जावळे गावाच्या हद्दीत भूखंड दिले आहेत. प्रत्येक लाभार्थीला वेगवेगळ्या आकाराचे भूखंड दिल्याने शेतकर्यांनी त्यावर इमारतीचे बांधकाम करण्यासाठी विकासकांशी भागीदारी केली आहे. उलवे येथे इमारत बांधण्यासाठी संबंधित लाभार्थी गेल्यावर तेथे जावळे गावातील काही शेतकर्यांनी ही आमची जमीन होती, त्यावर इमारतीचे बांधकाम करण्यासाठी लागणारी वाळू, वीट व इतर बांधकाम साहित्याच्या पुरवठ्याचा ठेका आम्हालाच मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. याच भूमिकेमुळे प्रकल्पबाधित व स्थानिक शेतकरी असा वाद सुरू झाला आहे.
गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता उलवा पुष्पकनगर येथील सेक्टर 25 ए मधील भूखंड क्रमांक 292 येथे आठ तरुणांनी जनककिशोर सिंग या विकसकाला मारहाण केली. जनककिशोर यांच्या गुप्तांगावर लाथा मारून तुडविण्यात आले. आमची जमीन गेली, बांधकाम पुरवठा न दिल्याचा राग ठेवून ही मारहाण करण्यात आली. यापूर्वीही पनवेल शहर पोलीस ठाण्यात दमदाटी करण्याची नोंद झाली आहे. जावळे गावच्या तरुणांनी जमीन सिडकोने संपादित केली असली तरी अद्याप त्यावरील बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यावर दावा केल्याने होत असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे पनवेल शहर पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिले आहेत. गुरुवारी सायंकाळी याबाबत पोलीस ठाण्यात जावळे गावच्या आठ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढे कायद्याच्या आड येणार्यांवर कायदेशीर कारवाई करू, असे मत उपायुक्त दुधे यांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी विकसकाला मारहाणीची तक्रार दाखल केल्यावर सुमारे अडीचशे विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी पोलीस अधिकार्यांना जाऊन आपली भूमिका मांडली. जावळे गावचे स्थानिक गाववाले हे आमचेच आहेत, मात्र त्यांनी आम्हाला शत्रूप्रमाणे वागणूक देऊ नये. आम्ही त्यांच्याशी तडजोडीसाठी पुढाकार घेतला होता. अखेर गुरुवारी मारहाण झाल्यावर नाईलाजास्तव आम्हाला व विकसकाला पोलिसांत धाव घ्यावी लागली. आम्हाला आमच्याच बांधवांशी संघर्ष करायचा नसल्याचे बेलापूर येथील सिडको भवनमध्ये जमलेल्या शेतकर्यांनी सांगितले.