भयमुक्तीसाठी पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी;
गृहखात्याने लक्ष देण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
चोरी आणि घरफोडीच्या अनुषंगाने लोकांना भयमुक्त करण्याची गरज आहे; अन्यथा पोलिसांवरील विश्वास उडेल. ते पाहता गृहखात्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केली. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 2025-26 गृह विभागाच्या पुरवणी मागणीच्या अनुषंगाने बोलताना खारघरमध्ये एका रात्रीत नऊ घरात झालेल्या चोरीसंदर्भात पोलिसांकडून नागरिकांना होणार्या वागणुकीचा दाखला देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिंता व्यक्त केली.
या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, पनवेल परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वाढत्या लोकवस्तीमध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषत्वाने खारघर सारखे शहर आहे जे सर्व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त आहे, मात्र कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अलिकडे वारंवार चिंताजनक प्रकार त्या ठिकाणी घडत आहेत. एका रात्रीत खारघर वास्तुविहारमधील संस्कृती सोसायटीतील पाच आणि पारिजात सोसायटीतील चार घरांमध्ये अशा एकूण नऊ ठिकाणी घरफोडी झाल्या आहेत. पोलिसांनी हे सर्व गुन्हे एकत्रितपणे नोंद करून
घेतले आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे याचा तपास कशा प्रकारे तपास केला जाणार असा नागरिकांमध्ये संभ्रम आहे. पोलिसांकडून तक्रारदारांना योग्य उत्तर दिली जात नाहीत. मनुष्यबळ कमी आहे, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असे तक्रारदारांना सांगितले जाते. विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये गुन्हेगार कॅप्चर झाले आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांच्या शोधासाठी काय केले जात आहे याची माहिती पोलिसांनी तक्रादारांशी समन्वय करून दिली पाहिजे. सुरक्षा रक्षक सर्व ठिकाणी आहेत. त्यांच्या बैठका झाल्या पाहिजेत तसेच भीती मुक्ततेसाठी पोलिसांनी नागरिकांना आश्वस्त केले पाहिजे आणि त्यासाठी गृह विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत
ठाकूर यांनी सभागृहात बोलताना केली.
रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
खारघर शहरात एकाच रात्री नऊ ठिकाणी घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. खारघर वास्तूविहार सेक्टर 16 येथील संस्कृती को.ऑप. हौ. सोसायटी या ठिकाणी बंद असणार्या पाच घरामध्ये तसेच पारिजात को. ऑप हौ.सोसायटी या ठिकाणी चार घरांमध्ये 3 जुलै रोजी मध्यरात्री 3च्या सुमारास घरफोडी करण्यात आल्या आहेत. घरफोडी करण्यात आलेली बहुतांशी घरे बंद होती. विशेष म्हणजे चोरट्यांचा या ठिकाणी सर्रास वावर दिसत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात वारंवार घरफोड्या होत असताना पोलीस करतात काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper