लंडन : वृत्तसंस्था
इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संघातील मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी झुंजार कामगिरी करण्यास तयार राहावे, अशी सूचना केली आहे ती भारताचा कर्णधार विराट कोहलीने. शनिवारी पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव लढतीत भारतीय संघाचा डाव 179 धावांत 39.2 षटकांत आटोपला. या पार्श्वभूमीवर विराटने पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या सहकार्यांना ही सूचना केली. रवींद्र जाडेजाने 50 चेंडूंत 54 धावा केल्याने भारताला सराव सामन्यात किमान दीडशे धावांच्या पुढे मजल मारता आली होती.
विराटने हेदेखील मान्य केले की त्याच्या सहकार्यांना डावपेचांची व्यवस्थिती अंमलबजावणी करता आली नाही. ‘परिस्थिती आव्हानात्मक होती, अशा परिस्थितीत डावपेचांनुसार वाटचाल करणे आवश्यक असते जे आम्हाला जमले नाही. इंग्लंडमधील काही ठिकाणी असे ढगाळ वातावरण सातत्याने असणार. त्यामुळे भारतीय संघाने 4 बाद 50 अशा स्थितीतून सावरत 180पर्यंतचे आव्हान उभारले हे काही वाईट नाही,’ असे विराट म्हणाला. न्यूझीलंडने या सराव लढतीत भारतावर सहा विकेट राखून मात केली. ‘वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत कधी कधी आघाडीची फळी अपयशी ठरू शकते. जे आमच्याबाबतीत झाले. तेव्हा हार्दिककडून झालेल्या धावा, धोनीने दडपण कमी करण्याचा केलेला प्रयत्न आणि जाडेजाचे अर्धशतक हे या अपयशातून भारतीय संघाला मिळालेल्या सकारात्मक बाबी आहेत,’ असे विराट म्हणाला. भारतीय संघातील गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल विराट म्हणाला, ‘लढतीच्या दुसर्या डावांत खेळपट्टीकडून गोलंदाजांसाठी काहीच उरले नाही. तरीदेखील आमच्या गोलंदाजांनी धावांना चाप लावला होता. अशा कमी धावसंख्येच्या आव्हानाच्या वेळीस क्षेत्ररक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. झेल घेण्याची सोप संधी त्यांनी साधली तरी लढतीला कलाटणी मिळू शकते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही स्तरावर कामगिरी उंचवावी लागेल.’