पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आदेश

अलिबाग : प्रतिनिधी
लोकसभा निवणुकीत रायगड मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीच्या उमदवाराला पराभूत व्हावे लागले. कोकणातील हा एकमेव मतदारसंघ आपण गमावला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा आपल्याला रायगडातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवून घ्यायचा आहे. दिवस कमी आहेत. आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिले. भाजप रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक शनिवारी (दि. 8) अलिबाग येथील मेघा टॉकीजमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर, भाजप कोकण संघटक सतीश धोंड, माजी मंत्री रवी पाटील, विष्णू पाटील, कृष्णा कोबनाक, प्रितम पाटील, अॅड. महेश मोहिते आदी या वेळी उपस्थित होते. रायगड लोकसभा मतदारसंघातील पराभव जिव्हारी लागला आहे. याचा आपल्याला वचपा घ्यायचा आहे. हा पराभव कुणामुळे झाला याचा हिशेब करत न बसता मी कुठे कमी पडलो याचा विचार करा. रायगड जिल्ह्यातील वातावरण भाजपला पोषक आहे. त्यामुळे खचून जाऊ नका. जिंकायची जिद्द ठेवा. आपल्याला रायगड जिल्ह्यातील सर्व जागा जिंकायच्या आहेत. कामाला लागा, असे पालकमंत्री म्हणाले. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडकर यांनी आभार मानले. शिवसेनेचे बिपीन महामुणकर, किरण ठाकरे, महेंद्र घारे यांनी या बैठकीनंतर भाजपत प्रवेश केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper