पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घटनेचा निषेध
कोलकाता ः वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (दि. 10) चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंसाचाराच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे मतदान प्रक्रियेला गालबोट लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेचा निषेध केला आहे.
पश्चिम बंगालच्या कूच बेहर जिल्ह्यातील सितालकुची भागात एका मतदान केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या आनंद बर्मन नावाच्या युवकावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. काही वेळानंतर सुरक्षा कर्मचार्यांनी जमावाला पांगवले. यानंतर सितालकुची भागामध्येच असलेल्या मतदान केंद्र क्रमांक 126वर पुन्हा एकदा कार्यकर्ते भिडले. सुरक्षा कर्मचार्यांनी वारंवार सांगूनदेखील जमाव ऐकत नव्हता. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार्या केंद्रीय सुरक्षा पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांकडची शस्त्रे हिसकावून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न जमावातील काहींनी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या व्यक्तींवर नाइलाजाने जवानांना स्वसुरक्षेसाठी गोळीबार करावा लागला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.