नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होऊ लागली होती, मात्र पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळायचा की नाही याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घ्यायचा आहे, असे वक्तव्य फिरकीपटू यजुवेंद्र चहलने केले आहे.
पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळायचा की नाही हे आमच्या हातात नाही. जर बीसीसीआयने सामना खेळण्याचा निर्णय घेतला तर आम्ही खेळू आणि जर त्यांनी नाही खेळण्याचा निर्णय घेतला तर आम्ही खेळणार नाही, मात्र या सर्व गोष्टींवर काहीतरी ठोस उपाय शोधण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानातले सर्व लोक हे अतिरेकी आहेत असे माझे म्हणणे नाही, पण हल्ल्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा मिळायलाच हवी.
24 फेब्रुवारीपासून भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाशी दोन ट्वेन्टी-20 आणि पाच वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ 16 जून रोजी समोरासमोर येणार आहेत. वेळापत्रकात कोणताही बदल झाला नसल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) याआधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्याबद्दल बीसीसीआय काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.