मुंबई : प्रतिनिधी
केदार जाधवऐवजी रवींद्र जडेजाला संघात संधी द्यायला हवी, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभव झाला. या सामन्याचे विश्लेषण करताना सचिन तेंडुलकरने संथ फलंदाजी करणार्या जाधवऐवजी जडेजाला संधी देण्यात यावी, असे म्हटले.
सचिन म्हणाला, इंग्लंडची सलामीच्या जोडीने 160 धावांची सलामी दिली. अशावेळी जडेजासारखा डावखुर्या हाताचा फिरकी गोलंदाज फायद्याचा ठरू शकतो. जर जाधव सातव्या क्रमांकावरच खेळणार असेल, तर त्या जागेवर जडेजाही चांगली फलंदाजी करू शकतो, तसेच जडेजा चांगली गोलंदाजीही करू शकतो.
जडेजाने भन्नाट झेल घेत जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या सलामीच्या जोडीतील रॉयला तंबूत परत पाठवले. अशाप्रकारे बदली खेळाडू म्हणून जडेजाने श्रेत्ररक्षणामध्ये चमक दाखवण्याची ही मालिकेतील दुसरी वेळ आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने ग्लेनमॅक्सवेलचा भन्नाट झेल घेतला होता.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 45व्या षटकात धोनीबरोबर फलंदाजी करायला केदार जाधव आला त्या वेळी भारताला 31 चेंडूंत 71 धावांची गरज होती. अशावेळी स्फोटक फलंदाजी न करता दोघांनी एक व दोन धावा घेण्यावर भर दिला. त्यावरून हे दोघे जिंकण्यासाठी खेळतच नाहीत अशी टीका नेटकर्यांनी ट्विटवरून केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper