Breaking News

50 वर्षांत झाले नाही, ते 50 दिवसांत केले!

भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – केंद्रातील मोदी सरकारने दुसर्‍या पर्वात 50 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या 50 दिवसांच्या कारभाराचे रिपोर्ट कार्ड शुक्रवारी (दि. 26) माध्यमांपुढे ठेवले. 50 दिवसांत सरकारने घेतलेले निर्णय गेल्या 50 वर्षांत घेतलेल्या निर्णयांपेक्षा उजवे आहेत, असा दावा या वेळी नड्डा यांनी केला.

आतापर्यंत सरकारचा 100 दिवसांचा प्रोग्रेस रिपोर्ट दिला जात होता, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे 50 दिवसांचा रिपोर्ट देण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसारच हे रिपोर्ट कार्ड मी आपल्यापुढे ठेवत आहे, असे नड्डा यांनी नमूद केले. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य डोळ्यापुढे असून विकासाच्या मार्गावर चालण्याचा निर्धार सरकारने केला आहे. सरकारने आपल्या नव्या पर्वात पहिल्या 50 दिवसांत कमकुवत वर्गावर लक्ष्य केंद्रित केले. ग्रामीण भारतातील प्रत्येक गावात 2024पर्यंत शुद्ध पाण्याची योजना हे क्रांतिकारक पाऊल आहे, असे नड्डा म्हणाले.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून 1.25 लाख किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल. 2022पर्यंत एक कोटी 95 लाख घरांना गॅस, शौचालय आणि शुद्ध पाणी देण्याचे वचन आम्ही पूर्ण करणार आहोत. मजुरांना निवृत्तीच्या वयानंतर तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याचा निर्णयही महत्त्वाकांक्षी आहे, असे नड्डा पुढे म्हणाले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply