पनवेल : रामप्रहर वृत्त
अतिवृष्टीमुळे घरात पाणी येऊन नुकसान झालेल्या डोलघर येथील 58 कुटुंबांना भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आर्थिक मदत केली आहे. या पूरग्रस्तांना घरटी तीन हजार रुपये घरोघरी जाऊन देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, शुक्रवार व शनिवारी तर वरुणराजाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे पनवेल तालुक्यातील डोलघर गावात पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते महेश बालदी यांनी रविवारी स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत नुकसानीचा आढावा घेतला आणि शासकीय मदतीची वाट न पाहता पूरबाधित कुटुंबांना प्रत्येकी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी (दि. 29) दुसर्याच दिवशी या मदतीचे वितरण करण्यात आले.
डोलघर ग्रामस्थांना मदत देतेवेळी पं. स. सदस्य तनुजा टेंबे, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, केळवणेचे उपसरपंच भानुदास गावंड, सदस्य सुशील ठाकूर, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विद्याधर जोशी, सदस्य संतोष हापसे, सुनीता वाघमारे, तुळसा हापसे, तसेच चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, कर्नाळा विभाग उपाध्यक्ष दीपक पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष रोशन पाटील, तारा गाव बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील, जीवन टाकळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.