Breaking News

पुलवामाचे चोख प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण अधिकार दिले होते. त्या अधिकाराचा योग्य प्रकारे वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक 2 ची कारवाई करीत पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांचे अड्डेच उद्ध्वस्थ करून टाकलेले आहेत.

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआयएसएफच्या पथकावर आत्मघातकी हल्ला करून भारतीय जवानांची निर्घृण हत्या करणार्‍या पाकिस्तान पुरस्कृत जैश या दहशतवादी संघटनेला भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे चोख प्रत्युत्तर दिले आहे. सर्जिकल स्ट्राईक 2 ची अंमलबजावणी करताना भारतीय हवाई दलाने मीग आणि तेजस या लढाऊ विमानांचा हल्ला पाकव्याप्त काश्मिरात करून जैश या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्थ केले आहेत. या हल्ल्यात जैशच्या 350च्या आसपास दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई दलाला यश आलेले आहे. विशेष म्हणजे सीमारेषेचे उल्लंघन न करता भारतीय हवाई दलाने ही कामगिरी करून पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर दिलेले आहे.गेल्या आठवड्यात पुलवामा येथे सीआयएसएफच्या पथकावर केलेल्या हल्ल्यात 40 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यांचे हे हौतात्म्य वाया न घालविता भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत सुमारे 350 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश मिळविले आहे. याबद्दल भारतीय हवाई दल, तसेच सैन्य दलाचे अभिनंदन करावे तेवढे थोेडेच आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने यापूर्वीही असाच सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्थ करून टाकले होते. तरीही शहाणपण न आलेल्या पाकने दहशतवाद्यांना आसरा देत भारतावर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. आता मात्र भारत शांत बसणार नाही हे पाकच्या लक्षात आलेले आहे. कारण दस्तुरखुद्द पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्फर यांनीही पाकला सज्जड दम देताना भारताची कुरापत काढणे बंद करा, असा इशारा पाकिस्तान सरकारला दिलेला आहे. कारण आज भारताचे लष्करी सामर्थ्य पाकिस्तानपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे याची मुशर्रफ यांना पूर्ण कल्पना आहे. जर पाकने बॉम्ब टाकले तर भारत बॉम्बचा वर्षाव करू शकतो असेही त्यांनी चारच दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. त्याचे प्रत्यंतर मंगळवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांना आला. कारण हवाई दलाने हजारो किलो वजनाचे बॉम्ब जैशच्या तळावर टाकून ते तळच उद्ध्वस्थ केलेले आहेत. हवाई दलाने केलेली ही कारवाई भारताची इच्छाशक्ती दाखवते. भारताचा संकल्प यातून दिसून येतो. हा नवीन भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेणार नाही. दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणार्‍यांनाही भारत माफ करणार नाही, हे पाकने लक्षात ठेवावे. पुलवामाचा हल्ला हा फुटीरतेचा भाग होता. भारतात राहून देशाशी गद्दारी करणार्‍यांनाही अशाच प्रकारे कठोर शासन देण्याची वेळ आली आहे. कारण आतापर्यंत पाकने दहशतवाद्यांच्या मार्फत जे जे हल्ले केले ते सर्व हल्ले फुटीरतेमुळेच झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. अशा फुटीरवाद्यांना खरं तरं या देशात राहण्याचा मुळीच अधिकार नाही. पुलवामा हल्ल्याला भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचा पाकने खरच धडा घेऊन आपल्या छुप्या कारवाया थांबवाव्यात अन्यथा त्या देशाचा असाच नायनाट होत राहील.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply