मुंबई : प्रतिनिधी
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर जनसंघाचे नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे आले. त्यावेळी जनसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या भूमिपूजनासाठी आचार्य अत्रे यांना निमंत्रित केले होते. आचार्य अत्रे हे जनसंघाच्या विचारसरणीचे विरोधक होते, पण त्यावेळी जनसंघाची परिस्थिती बघता अत्रे यांनी भूमिपूजन निमंत्रण स्वीकारले आणि त्यांनी अधिवेशनाच्या भूमीचे पूजन केले, पण आज जर अशी परिस्थिती आली तर काय होईल याचा विचारही करता येत नाही. पूर्वी राजकारणात असलेली सभ्यता आताच्या राजकारणातून लोप पावत आहे, अशी खंत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केली.
मुंबई पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा आचार्य अत्रे पुरस्कार ‘सकाळ’चे माजी संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांना राम नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे अध्यक्षस्थानी होते. तसेच या समारंभाला झी 24 तास चे मुख्य संपादक विजय कुवळेकर उपस्थित होते.
आचार्य अत्रे यांचे संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यातील योगदान फार महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे ‘केसरी’च्या संपादकीयमध्ये लोकमान्य टिळक काय लिहिणार याची उत्सुकता जनसामान्यांत असायची तशीच उत्सुकता ‘मराठा’मध्ये अत्रे काय लिहिणार याची जनसामान्यांत होती. आचार्य अत्रे यांच्यासारखा वक्ता 10 हजार वर्षांत होणार नाही, असे प्रतिपादन नाईक यांनी केले. समाजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न राधाकृष्ण नार्वेकर यांनी केला. सामाजिक आंदोलनात संपादकाच्या खुर्चीबाहेर जाऊन नार्वेकर यांनी काम केले, मात्र तसे करताना आपल्या संपादकीय कामाकडे दुर्लक्ष केले नाही. संपादकीयमधून मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या कामात राधाकृष्ण नार्वेकर यांचे श्रेय फार मोठे आहे. नार्वेकर संपादकीयमधून राजकीय नेत्यांना न बोचणारे अलगद चिमटे काढत, असे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य होते, असे कौतुक राम नाईक यांनी केले. ‘सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय?’ हे नार्वेकर यांचे पुस्तक इतर भाषेत भाषांतरीत होणे आवश्यक आहे. आजच्या काळात ज्येष्ठांचे प्रश्न फार गंभीर आहे. त्याकडे लक्ष देण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे, असे नाईक म्हणाले.
आचार्य अत्रे यांच्यासारखा वक्ता आणि पत्रकार 10 हजार वर्षांत होणार नाही. त्यांच्या नावाने मला हा पुरस्कार मिळतो याचा मला अभिमान आहे. सार्वजनिक क्षेत्रात पोटतिडकी असणारा आणि नखशिखांत प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणजे राम नाईक. अशा प्रामाणिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते हा पुरस्कार दिला याचा अधिक आनंद आहे, अशा भावना ‘सकाळ’चे माजी संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांनी
व्यक्त केल्या.