52 प्रवासी थोडक्यात बचावले; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना
महाड ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (दि. 1) सकाळी 7 वाजता माणगाव लोणेरेनजीक वडवली गावाजवळ कोकणात जाणार्या मुंबई चिपळूण-दहिवली या एसटीने अचानक पेट घेतल्याने एसटीचा बर्निंग थरार अनुभवण्यास मिळाला. एसटीच्या चालकाच्या प्रसंगावधनामुळे सर्व प्रवासी सुखरूपरीत्या खाली उतरले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र एसटी जळून खाक झाली. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणारी वाहतूक टोल फाटा नांदेड मार्गे गोरेगाव अशी वळविण्यात आली, असे वाहतूक यंत्रणेने सांगितले. मुंबई येथून चिपळूण दहिवली येथे जाण्यासाठी रातराणी एसटी (एमएच 20 बीएल 4209) निघाली होती. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे पळस्पे ते इंदापूरपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचली. मुंबई-गोवा महामार्गावर असणार्या माणगाव लोणेरेनजीक वडपाले गावाजवळ एसटी आली असता इंजीनमध्ये अचानक धूर येऊ लागल्याने चालक जगदाळे यांनी महामार्गानजीकच एसटी थांबविली आणि पाहणी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी चालकाच्या लक्षात आले की एसटीच्या इंजीनमध्येच शॉर्टसर्किट झाले आहे. यामुळे एसटी चालक जगदाने आणि वाहक माळी यांनी एसटीत असणार्या 52 प्रवाशांना त्यांचे सामान घेऊन खाली उतरण्यास सांगितले. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एसटीतील सर्व प्रवासी तातडीने आपले सामान घेऊन एसटीतून खाली उतरले आणि बघता बघता या एसटीने महामार्गावर पेट घेतला. चालक जगदाने आणि वाहक माळी यांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांना खाली उतरवल्याने जीवितहानी झाली नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रत्येक प्रवाशाला 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.