नागोठणे : प्रतिनिधी
शहराच्या काही भागात प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आलेली शुद्ध पाण्याची जलवाहिनी बंद करण्यात आली असल्याने शहराच्या काही भागातील नागरिकांना तथाकथित शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
येथील एमआयडीसीलगत असणार्या शुद्धिकरण केंद्रातील दोन्ही इलेक्ट्रिक मोटर्स 15 दिवसांपूर्वी जळून गेल्यामुळे नागोठणे शहराला शुद्ध पाणीपुरवठा करणारी यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही योजना अजून ग्रामपंचायतीच्या ताब्यात आली नसून सध्या त्याचा ताबा महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण यांच्याकडे व पर्यायाने संबंधित ठेकेदाराकडेच आहे. शुद्धिकरण यंत्रणा बंद झाल्यानंतर तातडीने एमजेपी तसेच संबंधित ठेकेदाराकडे पत्रव्यवहार केला होता, मात्र त्यांच्याकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी स्पष्ट केले आहे.