69 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ; दोघांना अटक
कोल्हापूर : प्रतिनिधी
जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 22) रात्री अटक केली आहे. हातकणंगले येथील माले मुडशिंगी गावात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि 69 जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहे आहेत. उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या स्फोटाच्या अनुषंगाने संशयितांकडे चौकशी सुरू आहे. विलास राजाराम जाधव आणि आनंदा राजाराम जाधव अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघेही माले मुडशिंगीचे रहिवासी आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली शुक्रवारी रात्री अज्ञाताने रस्त्यावर ठेवलेल्या वस्तूचा स्फोट होऊन ट्रक चालक दत्तात्रय गणपती पाटील यांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य, तसेच विधानसभा निवडणूक पार्श्वभूमी लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि स्थानिक पोलीस यांची पथके तयार करून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.