अलीकडे भ्रष्टाचाराने चरणसीमा गाठली आहे. तो एवढा वाढलेला आहे की तो आपल्या जगण्यातील एक आजारच बनलेला आहे. असा तसा आजार नाही तर गंभीर आजार बनलेला आहे. तो कसा संपवावा याचा प्रश्न प्रत्येक जनमाणसाच्या मनाला पडलेला आहे. यासाठी शासन त्याच्या पातळीवर काम करीत आहे, पण भ्रष्टाचाराची कीड उखडून टाकण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
सनदशीर मार्गाने भ्रष्टाचार संपविण्याचा विचार केल्यास आपल्याला त्रास जास्त होतो.ही पद्धत अतिशय त्रासदायक ठरते. म्हणून लोक आपल्याला जास्तीचा त्रास नको म्हणून भ्रष्टाचार करून आपली कामे पलक झपकते न झपकते अशा पद्धतीने करीत असतात. या पद्धतीने व्यवहार केल्यास ही पद्धत वाईट असली तरी त्रासदायक वाटत नाही. म्हणून लोक या वाईट पद्धतीचा आधार घेतात. उदाहरण द्यायचंच झालं तर वाहतुकीचं देता येईल. अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर बरेच जण पोलिसांना ‘माया’ देऊन वेळ मारून नेतात.
अभिनेता मकरंद अनासपुरेने काम केलेल्या एका चित्रपटात जीवनाधाराची विहीर चोरीला गेल्याचं चित्र उभारलं होतं. त्यात विहीर चोरीला गेल्याचं मकरंदने सिद्ध केलं होतं. कारण ती विहीर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मकरंदनं मिळवली होती. नव्हे तर विहीर मिळविताना भ्रष्टाचार झाला होता.
आम्ही भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे म्हणून नेहमी ओरडत असतो, पण त्यासाठी त्रास सहन करायला तयारच नाही. कारण काय तर आमच्याजवळ वेळच नाही. शिवाय एखाद्या माणसाने भ्रष्टाचार केलाही तरी तो सिद्ध करण्याचे पुरावे आमच्याजवळ नसतात. मग भ्रष्टाचार कसा बंद करता येईल. शिवाय तारीख पे तारीख करीत करीत खटले चालत असतात. त्यात पक्षकाराच्या वेळेचा अपव्यय होतो. पैसाही जातो. ज्या दिवशी न्यायालयाची तारीख असते, त्या तारखेला कामावर जाता येत नाही. म्हणजे आर्थिक भुर्दंड पडतो. न्यायालयात हजर राहावे लागते. हा खर्च सामान्य माणसाला परवडणारा नाही, तसेच यात दगदगही भरपूर आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी माहिती अधिकाराचे कायदेही आले, पण त्याचे स्वरूप फक्त नावापुरते उरले आहे. शिवाय काही काही मंडळींना या माहिती अधिकाराच्या तारखाही माहीत होत नाहीत आणि माहीत झाल्याच तारखा तर त्या तारखेवर माहिती देणारा हजर होईलच हे सांगता येत नाही. मग ज्या अधिकारीवर्गाकडून भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे मागण्यात येतात, तेच पुरावे वेळेवर न मिळाल्याने भ्रष्टाचार मिटेल कसा?
महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार हा आजच्या काही दशकांपासून नाही, तर हा पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. आपल्याला राजगादीवर बसता यावं म्हणून बंगालचा नवाब मीरजाफरने इंग्रजांशी हातमिळवणी करून बंगालमध्ये इंग्रजांना पाय रोवायला रान मोकळे केले होते. 15 ते 16व्या शतकात आलेल्या इंग्रज अधिकारी थॉमस रे याने भारतात व्यापारी सवलती मिळविण्यासाठी भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब केला. विशेषतः पूर्वीचे काही राजेही राजगादी मिळविण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करीत असत. कारण त्यांचं राजगादी मिळविण्याचं स्वप्न असायचं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांचे पुरावे असतात, पण आपल्याच मागे लचांड लागेल या भीतीने सामान्य माणूस भ्रष्टाचार मिटविण्यासाठी पुढे व्हायला तयार नाही.
भ्रष्टाचार मिटविण्यासाठी काही उपाय
नक्की करता येतील.
1) सर्वप्रथम भ्रष्टाचार मिटविण्यासाठी विशेष कायदे करावे लागतील. 2) बनविलेल्या कायद्याची अंमलबजावणी सक्षमपणे करावी लागेल. 3) भ्रष्टाचारावर कोणी आक्षेप घेतल्यास पक्षकाराला अभय द्यावे लागेल, तसेच त्यांना किंबहुना खर्च येणार नाही यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. 4) माहिती अधिकारात माहिती मागितल्यास ती लवकरात लवकर मिळावी यासाठी उपाययोजना असाव्यात. माहिती लवकर मिळत नसेल तर कठोरात कठोर दंड असावा व तो दंड जबरदस्तीने वसूल करण्यासाठी ठोस कार्यवाही व्हावी. 5) समजा भ्रष्टाचारावर टाकलेला एखादा खटला सिद्ध न झाल्यास पक्षकारावर मानहानीचे दावे नसावेत. 6) भ्रष्टाचारावर टाकलेले खटले लवकरात लवकर निकालात निघावेत. जेणेकरून वेळ वाचेल. 7) भ्रष्टाचारावर खटले दाखल करताना पक्षकारांना शुल्क नसावे, तसेच त्यांचे खटले हे सरकारी वकिलांनीच लढावे. 8) एखाद्या माणसाबद्दल थोडीशीही शंका निर्माण झाल्यास त्याने केलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी तक्रारकर्ते त्यांच्यावर जो खटला टाकतात, तो सिद्ध झाल्यास त्याला बक्षीस द्यायला हवे. 9) महत्त्वाचे म्हणजे भ्रष्टाचारावर एखाद्या माणसाने खटला दाखल केलाच तर त्याला तो लढण्यासाठी न्यायालयात जायची गरज नसावी. 10) भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास कठोरात कठोर शिक्षा असाव्यात. त्याची अंमलबजावणी सक्षमपणे व्हावी, जेणेकरून त्यापुढे कोणी भ्रष्टाचार करणार नाही.-अंकुश शिंगाडे, नागपूर (9923747492)
RamPrahar – The Panvel Daily Paper