खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत बुधवारी (दि. 6) रात्री बेफाम कंटेनर चालकामुळे अपघाताची घटना घडली. या कंटेनरच्या धडकेत भला मोठा वृक्ष कोसळला असून बाजूपट्टीवर उभ्या दोन दुचाकींचा चुराडा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी
झाली नाही.
बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कंटेनर (एमएच-43,वाय-9193) हा सावरोली- खारपाडा मार्गाने जात होता. पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत रिलायन्स कारखान्यासमोर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे अनियंत्रित झालेला कंटेनर टाकळ्याच्या मोठ्या वृक्षाला धडकला. त्यात वृक्ष मुळासकट उखडल्यानंतरही या कंटेनरने पुढे जात उभ्या असलेल्या दोन दुचाकीवर धडकला. यामध्ये दोन्ही दुचाकी पूर्णपणे चेपल्या जावून कंटेनर केबिनचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक आणि क्लिनरने घाबरून घटनास्थळावरून पळ काढला.हा अपघात रात्री आठ वाजता घडल्यामुळे मोठी जिवितहानी टळली. कामगार सुटण्याच्या वेळेत अपघात झाला असता तर त्याची तीव्रता वाढली असती.
RamPrahar – The Panvel Daily Paper