10 हजार 952 शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत
रोहे ः प्रतिनिधी
चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातील भातशेतीसह फळ व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. पीक अंतिम टप्प्यात आले असताना चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पावसामुळे रोहे तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या भात तसेच फळे व अन्य पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यात 10952 शेतकर्यांच्या 4148.47 हेक्टर क्षेत्रावरील भातपिकांचे, तर 19 शेतकर्यांच्या 2.01 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव माने व तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी व अन्य विभागाकडून रोहे तालुक्यातील भातशेती व फळबाग पिकाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. शासनाकडून जाहीर केलेल्या नुकसानभरपाईच्या अनुषंगाने रोहे तालुक्यात भातशेतीसाठी दोन कोटी 82 लाख रुपये, तर फळबाग पिकासाठी 36 हजार रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे.