अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील वरसोली येथील आंग्रेकालीन विठोबाची जत्रा उत्पत्ती एकादशीपासून म्हणजे शुक्रवारपासून 22 ते 26 नोव्हेंबर अशी पाच दिवस भरणार आहे. संबंधित देवस्थान विश्वस्त समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत, देवस्थानचे सेवेकरी, विविध व्यवस्थेसाठी व तयारीसाठी जोरदारपणे कामाला लागले आहेत.
या जत्रेसाठी केवळ परिसरातीलच नव्हे तर राज्याच्या अनेक भागातून भाविक मोठया संख्येने वरसोलीला हजेरी लावतात. नोकरी व्यवसायानिमित्त अन्यत्र स्थायिक झालेले ग्रामस्थदेखील आवर्जून या यात्रेला येतात. त्यामुळे यात्रेला मोठी गर्दी होत असते.
यंदाच्या जत्रोत्सवांवर अवकाळी पावसाचे सावट असल्याचे पहायला मिळते. यावर्षी शेवटच्या टप्प्यात झालेल्या अवेळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. यंदाच्या मोसमात अजूनही कापणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकर्यांची सुगी झालेलीच नाही आणि हातात पैसाही नाही. त्याच परिणाम या जत्रेमधील आर्थिक उलाढालींवर होण्याची दाट शक्यता आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper