मुंबई : प्रतिनिधी
अधिवेशनाच्या दुसर्याच दिवशी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेत अभिभाषण केले. विशेष म्हणजे राज्यपालांचे संपूर्ण भाषण हे मराठीत होते. या वेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला अनेक दिलासा देणारी
आश्वासने दिली.
आपल्या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकर्या उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. त्यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील. तसेच येथील भूमिपुत्रांना नोकर्यांमध्ये आरक्षण मिळावे यासाठीही आम्ही कायदा आणणार आहोत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वेळी शेतकर्यांचेही अनेक मुद्दे मांडले. राज्यपाल म्हणाले की, राज्याने नुकत्याच दोन मोठ्या आपत्तींचा सामना केला आहे. अवकाळी पाऊस आणि महापुरामुळे शेतकर्यांचे भरून न निघाणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना तत्काळ सहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील.महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या जातील. आर्थिक दुर्बल मुलींना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच तरुणी आणि महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शासनाकडून मुलींसाठी वसतिगृहे बांधून दिली जातील, असेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper