
कर्जत ़: बातमीदार, प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल कर्जत शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. या वेळी बोलताना भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी ‘राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी यांचे विचार किती खालच्या थराचे आहेत हे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांची कीव करावीशी वाटते,‘ अशी टीका केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही चुकीची वक्तव्ये केली होती. त्याचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने कर्जतमधील लोकमान्य टिळक चौकात रविवारी (दि. 15) सकाळी 11 वाजता जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी भाजपचे जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, भाजप किसान मोर्चा राज्य सचिव सुनील गोगटे, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, कर्जत तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, नगरसेवक बळवंत घुमरे, शहर महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा गोगटे, गायत्री परांजपे, लीना गांगल, मिलिंद खंडागळे, समीर सोहोनी, मंदार मेहेंदळे, प्रशांत उगले, मयूर शितोळे, विशाल सुर्वे, पांडुरंग गरवारे, दीपक वैद्य यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि कर्जत शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.