नागपूर : प्रतिनिधी
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मंगळवार (दि. 17)चा दुसरा दिवस गाजला तो भारतीय जनता पक्षाने शेतकर्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने. शेतकर्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्दा विरोधी बाकांवरील भाजपने लावून धरला. शेतकर्यांना 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्या, तोपर्यंत कामकाज करू नका, अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली. शिवसेनेने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी भाजपच्या सदस्यांनी शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाचे फ्लेक्स, बॅनर्स सभागृहात आणले होते. भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जमा होत घोषणा द्यायला सुरुवात केली.
सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय सभागृहातील कामकाज चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला. या वेळी शिवसेनेचे बुलडाण्यातील आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे लातूरच्या औसामधील आमदार अभिमन्यू पवार एकमेकांशी भिडले. यानंतर विधानसभेचे कामकाज सुरुवातीला अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने गोंधळातच दोन विधेयके मंजूर केली आणि कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper