कटक : वृत्तसंस्था
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी (दि. 22) तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने या सामन्यात जो जिंकेल तो मालिकाही जिंकेल. त्यामुळे लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
भारत दौर्यावर आलेला विंडीज संघ ट्वेन्टी-20 मालिका हरला. विशेष म्हणजे त्या मालिकेतही अंतिम सामन्यापूर्वी 1-1 अशी बरोबरी झाली होती आणि फायनलमध्ये टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारून बाजी मारली होती.
सध्या भारतीय फलंदाजी जोमात आहे. खासकरून सलामीवीर रोहित शर्मा, के. एल. राहुल, मधल्या फळीतील श्रेयस अय्यर, यष्टीरक्षक ऋषभ पंत जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. टी-20मध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा कर्णधार विराट कोहली झटपट क्रिकेटमध्ये मात्र अपयशी ठरला. त्यामुळे अंतिम सामन्यात चांगल्या कामगिरीची त्याच्याकडून अपेक्षा आहे. भारतीय गोलंदाजी पुन्हा लयीत आली आहे. खासकरून फिरकीपटू कुलदीप यादवचा आत्मविश्वास हॅट्ट्रिकनंतर उंचावला आहे, पण विंडीज फलंदाज निर्दयी आहेत. त्यांना आवर घालावा लागेल, अन्यथा त्यांच्यातही मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. शिमरान हेटमायर आणि शाय होप या जोडीने आपले कर्तृत्व सिद्ध केले असून, इतर फलंदाजही मोठे फटके खेळू शकतात. त्यामुळे सामना रंगतदार होऊ शकतो.
Check Also
पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा
२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …
RamPrahar – The Panvel Daily Paper