अलिबाग, रेवदंडा ः प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील निसर्गरम्य अशा रेवदंडा समुद्रकिनारी 33व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनास शनिवारपासून (दि. 11) प्रारंभ झाला. डॉ. राजू कसंबे हे संमेलनाचे अध्यक्ष असून राज्यभरातील 300हून अधिक पक्षीमित्र संमेलनात सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणार्या संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्र याबरोबरच पक्षीनिरीक्षणाचा अनुभवही पक्षीप्रेमींना मिळणार आहे.
पक्षीमित्र संघटना अॅमेझिंग नेचर संस्थेच्या संयोजनाखाली हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. ठाणे वन्यजीव विभागाचे अप्पर मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष जयंत वडतकर, मावळते अध्यक्ष किशोर रिठे, संमेलन अध्यक्ष डॉ. राजू कसंबे, स्थानिक संयोजक रूपाली मढवी आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष जयंत वडतकरकर आणि डॉ. राजू कसंबे यांच्या हस्ते सायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमात बाळासाहेब कुळकर्णी यांना जीवनगौरव, मुकुंद धुर्वे यांना पक्षीसंवर्धन व सुश्रूषा, प्रशांत वाघ व अश्विन पाटील यांना संशोधन व जनजागृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलन स्मरणिसकेचे तसेच पक्षी जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper