नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला नाव न घेता इशारा दिला. भारताकडून तीन-तीन युद्ध हरलो आहोत हे शेजारी देशाला चांगलेच ठाऊक आहे. भारतीय लष्कराला वाटले तर आठवडा किंवा 10 दिवसांत त्यांना हरवू शकते, असे ते म्हणाले.
या वेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस, बसपसह विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. आधीच्या सरकारांनी कैक दशकांपासून संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा रखडवला आणि व्होट बँकेचे राजकारण करीत राहिले, असा आरोप त्यांनी केला.
दहशतवाद, बॉम्बस्फोट या सर्व कायदा-सुव्यवस्थेतील अडचणी आहेत, असा विचार आधीचे सरकार करीत होते. भारतमाता रक्तबंबाळ होत होती. आपल्या सैन्याने कारवाईसाठी विचारणा केली असता त्यांना मनाई करण्यात येत होती. आता विचार तरुण आहेत. देश पुढे जात आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक केला जात आहे. एअर स्ट्राइक करण्यात येतो. दहशतवादाला थारा देणार्यांच्या घरात घुसून त्यांना धडा शिकवला जात आहे, याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले.
देशाची प्रतिष्ठा हेच माझ्यासाठी सर्वस्व
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीसीए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)च्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले. मोदी आपल्या प्रतिष्ठेसाठी जन्माला आला नाही. मोदीसाठी देशाची प्रतिष्ठाच सर्वकाही आहे. अनेक दशकांपासूनच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार्या आमच्या सरकारच्या निर्णयाला काही लोक सांप्रदायिक रंग देत आहेत. त्यांचा खरा चेहराही देशाने पाहिला आहे. देश सगळे काही पाहत आहे, समजत आहे, गप्प आहे, पण त्यांना सगळे काही समजत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper