पनवेल ः वार्ताहर
तालुक्यातील दुंदरे येथील 55 वर्षीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी फरारी असलेल्या पाचपैकी चार आरोपींना शुक्रवारी (दि. 7) सकाळी पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पनवेल न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
दुंदरे गावात राहणार्या शारदा गोविंद माळी यांचा शेजारी राहणार्या कुटुंबीयांबरोबर गंठण चोरीच्या कारणावरून वाद झाला होता. यातून माळी यांना प्रथम जाळून नंतर फासावर लटकविल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून आरोपींना तत्काळ अटक करावे आणि त्यांना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली होती. त्याचप्रमाणे भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही गुरुवारी पनवेल पोलीस ठाणे, तसेच दुंदरे येथे जाऊन आरोपींवर कारवाईची मागणी केली होती.
पनवेल तालुका पोलिसांनी फरारी झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरू करून अलका गोपाळ पाटील (वय 45), वनाबाई अर्जुन दवणे (60), गोपाळ विठ्ठल पाटील (48), हनुमान भगवान पाटील (42) या चार आरोपींना शेतातील घरातून ताब्यात घेतले आहे, तर या गुन्ह्यातील पाचवी आरोपी अल्पवयीन तरुणी आहे. आरोपींविरुद्ध आता भा. दं. वि. 302 व 201 हा वाढीव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पनवेल न्यायालयात हजर केले असता, 14 तारेखपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आल्याची माहिती निरीक्षक सतीश जाधव यांनी दिली.
Check Also
नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …
RamPrahar – The Panvel Daily Paper