जेएनपीटी : प्रतिनिधी

वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उभारण्यात येणार्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाण्याच्या टाकीचा (जलकुंभ) भूमिपूजन सोहळा नुकताच सरपंच विलास नारायण पाटील आणि सोनाली विलास पाटील या दाम्पत्याच्या हस्ते झाला. या वेळी सरपंच विलास पाटील यांनी सांगितले की, उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गाव परिसराचे औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे. अशा औद्योगिकरणामुळे तसेच वाढत्या नागरीकरणामुळे येथील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भविष्यात येथील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्या पाण्याच्या टाकीचा भूमिपूजन समारंभ गावकर्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. वेश्वी परिसरातील रहिवाशांनी यापुढेही पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन सरपंच पाटील यांनी करून ही योजना मंजूर करण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे ट्रस्टी व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी विशेष प्रयत्न केल्याने गावकर्यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास उपसरपंच शुभांगी मुंबईकर, ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, संदेश कोळी, नरेंद्र मुंबईकर, कल्पना कासूकर, निशा पाटील, लक्ष्मी कातकरी, माजी सरपंच विजय पाटील, संदीप पाटील, विद्याधर मुंबईकर, माजी सरपंच श्यामशेठ मुंबईकर, गणेश पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.