Breaking News

दुसर्‍या डावात भारताची घसरगुंडी

न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा भेदक मारा

ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्याची संधी गमावली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडला 235 धावांत बाद केल्यानंतर भारतीय संघाला 7 धावांची नाममात्र आघाडी मिळाली, मात्र दुसर्‍या डावात भारताची घसरगुंडी उडाली. ट्रेंट बोल्ट आणि इतर न्यूझीलंड गोलंदाजांच्या भन्नाटमार्‍यासमोर टीम इंडियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी भारताची अवस्था 6 बाद 90 अशी झाली असून, सध्या संघाकडे 97 धावांची आघाडी आहे. हनुमा विहारी आणि ऋषभ पंत हे फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत.
दुसर्‍या डावातही भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टने पायचीत बळी घेत त्याला माघारी धाडले. यानंतर टीम इंडियाला लागलेली गळती काहीकेल्या थांबलीच नाही. पृथ्वी शॉ, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे भारताचे बिनीचे शिलेदार एकामागोमाग एक बाद होत गेले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी हवामानाचा पुरेपूर फायदा घेत चेंडू हवेत वळवले. त्यामुळे सोमवारी उरलेले भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कसा प्रतिकार करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
त्याआधी, सलग दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तळातल्या फलंदाजांनी हैराण केले. भारतीय संघाने दिलेल्या 242 धावांचा पाठलाग करताना पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने पाच गडी गमावले. यानंतर दुसर्‍या सत्रातही भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करीत सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण केले, मात्र तळातल्या फळीतील कॉलिन डी-ग्रँडहोम, कायल जेमिसन आणि निल वँगर या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरामुळे न्यूझीलंडने भारताला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांत आटोपल्यामुळे भारताला अवघ्या 7 धावांची आघाडी मिळाली. जेमिसनने फटकेबाजी करत 49 धावा केल्या. पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने चार, जसप्रीत बुमराहने तीन, रवींद्र जडेजाने दोन, तर उमेश यादवने एक बळी घेतला.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply