
कर्जत : प्रतिनिधी
हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करताना आपण दक्षता घेत नाही आणि त्याचाच गैरफायदा काहीजण उठवतात. आपण जर ही उपकरणे काळजीपूर्वक हाताळली तर आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे याचा निश्चितच प्रत्यय येईल, असे मत अॅड. योगिनी बाबर यांनी येथे व्यक्त केले. कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात ’मुलींची सुरक्षितता’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अॅड. योगिनी बाबर बोलत होत्या.प्रत्येक महिन्याला पासवर्ड बदला आणि प्रत्येक वेळी लॉग आऊट करायला विसरू नका, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. नुसतं सेल्फी, व्हॉट्सअॅपवरील मेसेज, व्हिडीओ बघण्यात गर्क न रहाता, डोळे उघडून आजूबाजूला पहा, अन्यथा आपली थोडीशी चूक आयुष्यभरासाठी नुकसान करून ठेवील. हल्ली मोबाईलमुळे संवाद होत नाहीत. घरातल्या घरात देखील एकमेकांशी बोलणे होत नाही. वॉट्सपवरूनच मेसेजद्वारे आपण बोलत असतो. हे टाळा, असा सल्ला अॅड. बाबर यांनी दिला. स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विजय मांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. वैशाली जाधव यांनी प्रास्ताविकात परिसंवादाचा हेतू विषद केला. प्रा. प्रियांका बांदिवडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थिनींनी सर्वच ठिकाणी जपून व सावधपणे वावर करावा. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाताना धीर न सोडता आत्मविश्वासाने सामोरे जावे. स्वतःची सुरक्षा करताना प्रसंगावधान बाळगावे, असे विजय मांडे यांनी सांगितले. शिक्षिका व विद्यार्थिनी या परिसंवादाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper