पनवेल : वार्ताहर
खारघरसह पनवेल महानगरपालिकेमधील शिधापत्रिका नसणार्या गरीब आणि गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य उपलब्ध करून द्या, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लीना गरड यांनी शासनाकडे
केली आहे.
मागील एक महिन्यापासून मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील उद्योगधंदे, कामधंदे आणि एकूणच लॉकडाऊनमुळे सर्वांची कामे गेलेली आहेत व अनेकांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. अशाप्रकारचे उपासमारी व बेरोजगारी झालेले बरेच लोक खारघर तसेच पनवेल महापालिकेमधील इतर परिसरामध्ये राहतात. यामध्ये बरेचसे कामगार, ड्रायव्हर, घरकाम करणार्या महिला, हॉकर्स इत्यादी गरीब कुटुंब, गावांमधील दहा बाय दहा चाळीमध्ये हे वास्तव्य करतात.
खारघरसारख्या शहरामध्ये सुद्धा सेक्टर 12, घरकुल, वास्तुविहार, सेक्टर 3, 4, 21 इत्यादी ठिकाणी बरेचसे भाडेकरू 5000 रूपयांपेक्षा कमी भाडे देऊन आपल्या कुटुंबीयांसह राहात आहेत. यातील बर्याच जणांकडे शिधापत्रिका नाही किंवा ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न 60000 च्या पुढे आहे. आताच्या काळामध्ये लॉकडाऊनमुळे सर्वांची कामे गेलेली आहेत. त्यामुळे शिधापत्रिका असो किंवा नसो खारघर व पनवेल महापालिका परिसरामधील अशा गरीब व व गरजू कुटुंबाला तीन महिन्याचे अन्नधान्य तात्काळ मोफत मिळावे किंवा कमी दरामध्ये उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका तथा खारघर फोरम अध्यक्षा लीना अर्जुन गरड यांनी प्रांताधिकारी व संबंधित प्रशासनास पत्राद्वारे केली आहे.