अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना सक्त मनाई
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात सुरक्षित राहणे हा एकमेव पर्याय आहे. तरीही अनेक लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आणखी कडक पाऊल उचलत शहरातील हॉस्पिटल्स, केमिस्ट व अन्य अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापने सायंकाळी 5 वाजल्यानंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत नागरिकांनाही रस्त्यावर फिरण्यास बंदी असणार आहे. याबाबत पोलिसांनी बुधवारी (दि. 8) विविध भागांत संचलन करून माहिती दिली.
नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पनवेल तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या 21 झाली आहे. यापैकी दोन जणांची परिस्थिती गंभीर आहे. अनेक नागरिक वेगवेगळी कारणे सांगून दिवसभर खरेदीसाठी बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटल्स, केमिस्ट, एपीएमसी यांसारख्या मुख्य सेवा वगळून इतर सर्व दुकाने, बिग बाजार, रिलायन्स मार्ट, इतर फळ-भाजीपाला मार्केट, फिश मार्केट, चिकन-मटण शॉप, टेकअवे हॉटेल सायंकाळी 5 वाजल्यापासून बंद राहणार आहेत. त्यानंतर रस्त्यावर दिसूून येणार्या नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पोलिसांनी संचलन करून माहिती दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper