Breaking News

वांद्रे येथील मजुरांच्या उद्रेकाला राज्य सरकारच जबाबदार -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी – आम्हाला गावी जाऊ द्या, अशी मागणी करत परराज्यातील शेकडो मजुरांनी मंगळवारी वांद्रे स्टेशनवर धडक दिल्याने सर्वच यंत्रणा हादरल्या आहेत. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर हा उद्रेक झाल्याने त्यावर आणखीच चिंता व्यक्त होत आहे. यावरून आता राजकारणही तापू लागले असून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचे खापर राज्य सरकारवर फोडले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून या घटनेवर भाष्य करताना राज्य सरकारवर टीका केली. जे काही घडले त्याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. वांद्रे येथे हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे, असे नमूद करताना परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारकडून परराज्यातील मजुरांची पुरेशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने त्याबाबत ठोस उपाय केलेले नाहीत. आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

जी स्थिती सध्या उद्भवली आहे त्या स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल, ही पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे, असे फडणवीस यांनी पुढे नमूद केले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply