Breaking News

तीन महिन्यांचा मालमत्ता, पाणी कर माफ करा

आमदार गणेश नाईक यांची मागणी

नवी मुंबई : बातमीदार – कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेला आहे. उद्योग, व्यवसाय आणि रोजगार-स्वयंरोजगार ठप्प झाल्याने विविध शासकीय देयके भरताना नाकीनऊ येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि लघु उद्योजकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांचा मालमत्ता व पाणी कर माफ करावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कामगार वर्ग घरी बसला आहे. कारखाने बंद आहेत. स्वयंरोजगार देखील करता येत नाही. उदरनिर्वाहाची साधने लॉक झाली आहेत. नागरिकांचे आणि विशेषतः लघुउद्योजकांचे उत्पन्न गोठले असून दुसरीकडे शासकीय देयकांचा मोठा भार आहे. या संकटकालीन परिस्थितीमध्ये या घटकांना थोडाफार दिलासा देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी सूचना करीत आमदार नाईक यांनी किमान एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा निवासी मालमत्तासाठी आणि लघु उद्योजकांसाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर माफ करावा, अशी आग्रही मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply