नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांचा सहा महिन्यांचा मालमत्ता कर व पाणी देयक माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भगत यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.
भगत यांनी दिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, मार्च 2020च्या सुरूवातीपासून नवी मुंबईत कोरोनाचे अस्तित्व पहावयास मिळाले असून आता कोरोनाचा नवी मुंबईत खर्या अर्थाने उद्रेक झालेला आहे. सोमवारी (दि. 11) नवी मुंबईत कोरोनाचे 105 रूग्ण आढळले, मंगळवारी (दि. 12) 77 रूग्ण आढळले आहेत. सध्या कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून अर्थकारण थंडावलेले आहे. कामधंदा बंद आहे. हातावर पोट असणार्या श्रमिकांना गेल्या तीन महिन्यापासून बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. घरकाम करणारया महिलांनाही काम नाही. अनेक कंपन्या व कारखाने बंद आहेत. कामगारांना मार्चपासून वेतन झालेले नाही. अनेकांना दररोजच्या गरजा भागविण्यासाठी आता इतरांपुढे हात पसरावे लागत आहेत.
कोरोनाचे एकीकडे संकट तर दुसरीकडे मध्यमवर्गीयात पैशाची चणचण यामुळे नवी मुंबईकर अडचणीत सापडले आहेत. ही समस्या गंभीर आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सर्व बाबी विचारात घेवून पालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांचा सहा महिन्यांचा मालमत्ता कर व पाणी देयक माफ करावे, अशी मागणी रवींद्र भगत यांनी आयुक्तांकडे केली आहे.