मोहोपाडा : प्रतिनिधी – लॉकडाऊन व संचारबंदीत शिथिलता दिल्याने चौक परिसरातून उत्तरप्रदेशला जाण्यासाठी पनवेल रेल्वेस्टेशनला 12 बसेसमधून 286 मजूर रवाना झाले.
आपापल्या गावाला जाण्याची मुभा मिळाल्यावर चौक परिसरातून अनेक उत्तरप्रदेशमधील कामगार कुटुंबातील सदस्यांसह गावी जाण्यासाठी चौक येथील स्वराज हॉटेल जवळ शेकडोंच्या संख्येने जमा झाले होते. खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक व कर्मचारी दिवसरात्र मेहनत करून या कामगारांना एकत्र केले. सकाळी लवकर हे कामगार कुटुंबातील सदस्य यांच्या सह उपस्थित होते.
सर्वांचे रीतसर फॉर्म भरून 12 एसटी बसगाड्यामधून 286 जणांना पनवेल रेल्वे स्टेशन येथे सोडण्यात आले. या वेळी पिण्याच्या पाण्याची व खाण्याची सोय तलाठी व ग्रामसेवक यांनी स्वखर्चाने केली. प्रत्येक बस गाडीत तलाठी, ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते.