Breaking News

पायी गावी निघालेल्या नागरिकांसाठी वाहनांची सोय

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोनाच्या महामारीतून बचावासाठी मुंबई तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरून पायपीट करीत कोकणातील आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता अबालवृध्दांसह हजारो नागरिक चालत जात असल्याने येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मागील तीन दिवसांपासून रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने आणि तहसीलदार कविता जाधव यांच्या परवानगीने चालत जाणार्‍या नागरिकांना नागोठणे ते माणगावदरम्यान भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल बस तसेच इतर खासगी वाहनांद्वारे सोडण्यात आल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी सांगितले.

या नागरिकांसाठी आतापर्यंत साधारणतः 15 वाहने सोडण्यात आल्याचे स्पष्ट करताना रत्नागिरी जिल्ह्यात चालत जाणार्‍या नागरिकांना परतणार्‍या रिकाम्या टेम्पो आणि मालट्रकमधून रवाना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळी येथून उत्तर प्रदेशात परतणार्‍या मजुरांना रोह्यातून मुंबईकडे जाणार्‍या एसटी बसेस मिळण्यासाठी एक बस सोडण्यात आली. तसेच खारपाडा पोलीस चेकपोस्ट येथून कोकणात जाण्यासाठी खासगी कंपन्यांच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्याने महामार्गावरून चालत जाणार्‍या नागरिकांच्या संख्येत घट झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply