Breaking News

कर्नाटकला रवाना झालेले 200 मजूर पुन्हा नवी मुंबईत परतले

पनवेल : बातमीदार

नवी मुंबईतून कर्नाटकात एसटी बसेसने गेलेल्या 200 मजुरांना नियमानुसार सीमेवर रोखण्यात आले. त्यामुळे पुढे जाण्याऐवजी या मजुरांनी नवी मुंबईत परत येणे पसंत केले. नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात टाळेबंदीत दोन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने मजुरांची परवड सुरू होती. त्यामुळे परप्रांतीय मजुरांनी आपल्या मूळगावी जाण्याचा मार्ग पत्करला आहे.

यासाठी सरकारने रेल्वे व एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. नवी मुंबईत बिगारी, गवंडी काम करणार्‍या सुमारे 200 मजुरांनी कर्नाटकातील बिदर गुलबर्गा येथे जाण्यासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाच्या नऊ बसेसमधून हे मजूर 22 मे रोजी सानपाडा भागातून निघाले. बेळगाव येथे पोहचल्यावर त्यांना कर्नाटक सीमेवर तेथील प्रशासनाने नियमानुसार रोखले व पुढील प्रवेशास मनाई केली. त्या ठिकाणाहून या मजुरांचे मूळगाव दूर असल्याने त्यांनी 12 तासांनंतर अखेर सानपाडा येथे परत सोडण्याचा आग्रह धरला. त्यानुसार त्यांना पुन्हा नवी मुंबईत सोडण्यात आले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply