पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाच्या हाहाकाराने तालुक्यातील बहुतेक गावांत घरांची छपरे उडाली आहेत. झाडे, विजेचे खांब पडून तसेच अनेक ठिकाणी शेड उडून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रविशेठ पाटील यांनी तालुक्यातील हमरापूर विभाग रावे, झोतिरपाडा विभाग शिहू, बेणसे वाशी विभाग या भागात झालेल्या हानीची सतत तीन दिवस पाहणी केली.
या वेळी त्यांनी तहसीलदार, तलाठी यांना घटनास्थळी जाऊन लवकरात लवकर पंचनामे करावेत तसेच सामान्य माणसापर्यंत मदत लवकरात लवकर कशी पोहचेल यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. चक्रीवादळाचा पेणला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून गोरगरिबांची घरे उद्ध्वस्त झाली. त्यासाठी शासकीय मदत लवकरात लवकर कशी मिळेल यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले. त्यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper