खोपोली : प्रतिनिधी – चार दिवसांपूर्वी सलिम शेख यांचे भाजीचे दुकान ऐन पावसाळ्यात तोडल्याने कोरोनाच्या टाळेबंद काळात माझ्यावर अन्याय झाला असल्याचा दावा करीत झालेल्या अन्यायाबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या शहरातील प्रमुख पदाधिकार्यांना माहिती देत न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यावेळेस कोणीही प्रतिसाद न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शेख यांनी करीत पक्ष नेतृत्वावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
गेली अनेक वर्ष शेकापक्षाचे प्रामाणिक काम करणारे सलीम शेख यापूर्वी शहरातील समाजमंदिर रस्त्यालगत गेली 10 ते15 वर्षापासून फळ विक्रीचा व्यावसाय करीत होते. परंतु तत्कालीन मुख्याधिकारी यांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेत या ठिकाणी व्यावसाय करणार्या बाधित व्यावसायीकांना महात्मा फुले भाजी मंडई रस्त्यालगत जागा दिली. याबाबत सकारात्मक भूमिका नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधींनी घेतल्याने शेख यांच्यासह सर्व व्यावसायिकांनी त्याठिकाणी व्यावसाय थाटला परंतु अचानक ऐन पावसाळ्यात भाजीचे दुकान तोडल्याने शेख यांनी व्यथीत होत शेकापक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला साकडे घालत न्यायाची याचना केल्याची माहिती शेख यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
या वेळी स्वतःची पदरमोड करीत पक्षाचे काम गेली 10 ते 15 वर्षापासून करीत असताना झालेल्या अन्याया दरम्यान पक्षाने दुर्लक्ष केल्याने जाहिरपणे नेतृत्वावर नाराजीचा सुर आवळत पक्षाचे नेते, आमदार खोपोलीत आल्यावर मागे पुढे धावणारे संधी साधू नेते गेले कुणीकडे? असा सवाल शेख यांनी विचारला आहे.