अलिबाग : प्रतिनिधी
कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक दोन दिवसांच्या पाहणी दौर्यावर येणार आहे. केंद्राचे हे पथक मंगळवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यात पाहणी करून नुकसानीचा आढावा घेणार आहे.
कोकणात 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नागरिकांच्या मालमत्तांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक मंगळवारी रायगड जिल्ह्यात येत आहे. रमेश कुमार गांता (आयएएस) हे या दौर्याचे प्रमुख असणार असून ग्रामीण विकास मंत्रालय, वित्त मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाचे प्रतिनिधीदेखील पथकात असतील.
केंद्रीय पथक मंगळवारी सकाळी 10.40 वा. अलिबाग तालुक्यातील नागाव, 11.20 वा. चौल आणि दुपारी 12.20 वा. मुरूड तालुक्यातील काशिद येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. त्यानंतर मुरूड येथे दुपारी 1.10 ते 2 या वेळेत जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी करणार आहेत. मग दुपारी 3 वा. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, 4 वा. म्हसळा तालुक्यातील तुरुंबडी, सायंकाळी 4.45 वा. खरसई येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून रात्री पथक महाड येथे मुक्काम करून दुसर्या दिवशी रत्नागिरीला रवाना होईल. केंद्रीय पथक हे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्र सरकाला सादर करणार आहे.
Check Also
कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …
RamPrahar – The Panvel Daily Paper