नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत काम करणार्या कर्मचारी बससेवे बरोबरच सर्वसामान्य प्रवाशी नागरिकांसाठी बस सेवा कार्यान्वित केली आहे. मात्र आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी एकास दोन तिकिटे असा आदेश काढला आहे. त्यामुळे बससेवा सुरु करीत असताना त्यासाठी येणार्या खर्चापोटीची रक्कम महापालिका किंवा राज्य शासनाकडून अनुदानरुपी घेऊन त्यावरील खर्च करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे परिवहन उपक्रमाने एका प्रवाशास दोन तिकीटे देण्याच्या निर्णयास तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती वजा मागणी आमदार गणेश नाईकांनी परिवहन व्यवस्थापकांना केली आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बसमध्ये प्रवास करते वेळेस सामाजिक व शारिरीक अंतराचे अनुपालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बस मधील आसन क्षमतेनुसार प्रत्येक दोन आसनावर एक प्रवाशी म्हणजे 50 टक्के प्रवाशी वाहतुक सुरु करुन एका प्रवाशास दोन तिकीटे देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे जाहिर केले आहे. ही बस सेवा सुरु रहाण्यासाठी डिझेल, कर्मचारी वेतन, इंधन, बसची दुरुस्ती व देखभाल, इतर मुलभूत खर्च, कार्यालय, नियंत्रण कक्ष व बसचे निर्जंतुकीकरण, कर्मचार्यांना/अधिकारी यांना हॅण्ड सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, मास्क इत्यादी साहित्यावर खर्च होणे अपेक्षित आहे.
परंतु हा खर्च या आपत्कालिन परिस्थितीमध्ये शहरातील सर्वसामान्य प्रवाशी नागरिकांना बस सेवा देत असतांना नागरिकांकडून अधिकच्या तिकीटाचे पैसे घेऊन वसुल करणे उचित नाही. त्याकरिता सदरची बससेवा सुरु करीत असतांना त्यासाठी येणार्या खर्चापोटीची रक्कम महापालिका किंवा राज्य शासनाकडून अनुदानरुपी घेऊन त्यावरीलखर्च करण्याची आवश्यकता आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने एका प्रवाशास दोन तिकीटे देण्याच्या निर्णयास तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper