Breaking News

शेतकर्‍यांच्या कर्जवाटपासाठी भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई ः प्रतिनिधी

पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकर्‍यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे, तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष सोमवारपासून (दि. 22) राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करेल, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 21) येथे केली.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात कोरोनाचे संकट आहे म्हणून पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत. राज्य सरकारच्या ‘बांधावर खते आणि बियाणे’ योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पीककर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे भाजपने आंदोलनाचा निर्णय घेतला. राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी, पण शेतकर्‍यांना पीककर्ज द्यावे आणि कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी भाजपची मागणी आहे. पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात ठिकठिकाणी बँकांसमोर निदर्शने करतील. तसेच शेतकर्‍यांच्या सह्या गोळा करून त्यांचे निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात येईल. या आंदोलनात कोरोनाच्या साथीमुळे योग्य काळजी घेतली जाईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply