नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईत दिघा नोड वगळता कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जूनच्या आरंभीस हा फैलाव वेगाने झाला आहे. यात सर्वाधिक बाधित हे कोपरखैरणे आणि तुर्भे परिसरांत आहेत. दोन्ही विभागांतील आकडा एक हजारच्या आसपास पोहोचला आहे. सध्या कोपरखैरणे, नेरुळ आणि घणसोलीत रुग्णांचा आकडा अधिक आहे. या तिन्ही विभागांत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण आढळले. त्यानंतर वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संसर्ग झाला. त्यामुळे तुर्भे आणि कोपरखैरणे नोडमध्ये रुग्णांची संख्या वाढत गेली.
तपासणीचा वेग वाढल्याने ही रुग्णसंख्या दिसत आहे. शहरातील रुग्णसंख्या 25 दिवसांत दुप्पट झाली आहे. त्याविरोधात ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी सूचनांचे गांभीर्याने पालन करण्याचे आवाहन नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
कोरोना प्रादुर्भाव झाल्याच्या दिवसापासून ऐरोली नोडमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात होती. मे महिन्याच्या अखेरीस या परिसरातील रुग्णसंख्या 150च्या आसपास होती. त्यानंतर 1 जून ते 23 जून या कालावधीत या परिसरातील रुग्णसंख्या 700 च्या आसपास पोहोचली होती. 24 जून रोजी या भागात सर्वाधिक 84 रुग्ण आढळले आहेत. ऐरोलीतील आजची रुग्णसंख्या 800 इतकी आहे. 236 रुग्णांची गुरुवारी एकाच दिवसात नव्याने भर पडली. तर नऊ जण दगावले असून मृतांचा आकडा 189 झाला आहे. एकाच दिवसात 102 जण करोनामुक्त झाले.
ही आहेत कारणे
कोपरखैरणे सेक्टर-19 सीमध्ये 1 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला. बुधवारी (24 जून) एकाच दिवशी सहा रुग्ण आढळले. 1 एप्रिल ते 24 जूनपर्यंत रुग्णवाढीचा कालावधी 15 ते 16 दिवस असा होता.
वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) आवारातून करोनाचा प्रसार झाल्याचे बोलले जात आहे. टाळेबंदीत ‘एपीएमसी’ हे अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ते बंद करण्यात आले नव्हते. बाजाराच्या आवारात जाणारे कर्मचारी आणि माथाडी कामगार हे तुर्भे आणि कोपरखैरणे भागांत राहतात.
घणसोलीतही रुग्णसंख्यावाढीचा वेग कायम राहलेला आहे. बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय सचिव पातळीवर घेतला जातो. त्यात पालिकेचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे तुर्भे, कोपरखैरणे आणि घणसोलीतील रुग्णसंख्यावाढीचा अंदाज पालिकेला आला नाही.