भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी
पनवेल : वार्ताहर – जालना (मंठा) तरुणी हत्येप्रकरणी नराधमावरती त्वरित कठोर कार्यवाही करावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जालना (मंठा) येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच घडली. माळी समाजाच्या वैष्णवी नारायण गोरे या एका नवविवाहित तरुणीवर शेख अल्ताफ या माथेफिरूने भर बाजारात वार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असून, त्यामुळे महिलावर्गात अतिशय भीतीचे वातावरण आहे. समाजात चीडसुद्धा निर्माण झाली आहे.
नराधमाला कठोर शिक्ष व्हावी यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि पनवेल महानगरपालिकेचे
माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी दिली.