चिपळूण : प्रतिनिधी
जोरदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर येऊन हे पाणी थेट शहरात शिरले. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
रात्रभर कोसळणारा पाऊस व कोयना धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात घुसले आणि बाजारपेठ पाण्याखाली गेली. पाणी पातळीत वाढ झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. येथील वाहतूक गुहागर बायपास रोडकडून वळविण्यात आली.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला, तर लाहेरीत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दुसरीकडे सांगलीत मागील दोन दिवसांपासून पडत असणार्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या भागाची चिंता पुन्हा वाढली असून, मागील वर्षीप्रमाणे यंदाही पुराची शक्यता आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली असून, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत.