Breaking News

पनवेल ते ठाणे अपुर्या बसेसमुळे प्रवाशांचे हाल

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई परिवहन विभागाने अत्यावश्यक सेवेसाठी बसेस सुरू केल्या आहेत. सध्या ट्रेन बंद असल्यामुळे सर्व भार नवी मुंबई परिवहन सेवेला वहावा लागत आहे. मात्र सध्या काही मार्गांवरील बसेस धावत असल्या तरी सायंकाळीच शेवटची फेरी आटोपती घेत असल्याने रात्री प्रवास करणार्‍या नागरिकांचे मात्र हाल होऊ लागले आहेत.

पनवेल ते ठाणे मार्गावर रकून 24 बसेस धावत आहेत. लॉकडाऊनपूर्वी या लांबलचक मार्गावर धावणार्‍या बसेसची संख्या जास्त होती. मात्र ही संख्या सध्या कमी करण्यात आली असून रातरी उशिरा पनवेल वरून ठाण्याला जाणार्‍या प्रवाशांना व परिवहनच्या कर्मचार्‍यांना मात्र खासगी वाहने करून आपले घर गाठावे लागत आहे.

नवी मुंबईतून पनवेल व ठाणे येथे व या दोन्ही भागांतून नवी मुंबईत नोकरीनिमित्त येणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. सकाळी पनवेल डेपोमधून 6.45 ला पाहिली बस व 7.45 वाजता शेवटची बस ठाण्याच्या दिशेने धावते. ठाण्याहून सकाळी 7.30 वा. तर रात्री शेवटची बस 9.20 ची बस सुटते. प्रत्येक बसेसच्या  दिवसभरात दोन फेर्‍या होतात. दिवसभरात जरी योग्य फेर्‍या या बसेसच्या होत असल्या तरी रात्री पनवेल ते ठाणे बसची 7.45 वाजता शेवटची फेरी होत असल्याने त्यांनंतर पनवेल ते ठाणे प्रवास करणार्‍या नागरिकांना मात्र असनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

अनेकदा एका सीटवर एकच प्रवासी या अटीमुळे अनेक प्रवाशांना बसमध्ये परवानगी नाकारली जाते. कित्येकदा तासनतास वाट पाहत उभे राहावे लागते. त्यामुळे महिला वर्गाची सर्वात जास्त कुचंबणा होते. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करतात.

अनेक प्रवासी पनवेल ते ठाणे प्रवास करणारे असतील तर बसेस वाढवल्या जातील. तशी मागणी आमच्याकडे प्रवाशांनी करावी. त्याबाबत डेपोमध्ये चौकशी केली जाईल व निर्णय घेऊ.

– शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई महापालिका

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply