भाजपची टीका
मुंबई : प्रतिनिधी
एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर शेलार यांनी ट्वीट केले आहे.
आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. कुलपती म्हणून मा. राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ञांची मते धुडकावली. यूजीसीला जुमानले नाही. मंत्रिमंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले, असा सवाल शेलार यांनी केला आहे. महाराष्ट्रातील पाडून दाखवा सरकारने स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले! पण… विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका… परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या… यश तुमच्या वाट्याला नक्की येईल… तुमचे भविष्य उज्ज्वलच आहे, असेही भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. एकंदरीतच राज्य सरकारच्या काही निर्णयांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा झाला आहे.