अलिबाग : प्रतिनिधीबेरोजगार तरूण नोकरीधंद्यासाठी भटकत असताना त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेतला जातो. असाच गैरफायदा घेऊन 45 बेरोजगारांना 2 कोटी 91 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हा कामोठे (ता. पनवेल) येथील राहणारा आहे. इतर दोन बोरिवली येथील तर एक अलिबाग तालुक्यातील भोनंग गावचा राहणारा आहे. त्यांचे इतर तीन सहकारी अनोळखी आहेत. 9 ऑक्टोबर 2016 पासून या सहा जणांच्या टोळीने बेरोजगार उमेदवारांना पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीस लावतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून बँकेमार्फत आणि रोखीने अशी 2 कोटी 90 लाख 95 हजार इतकी मोठी रक्कम गोळा केली. विशेष म्हणजे या टोळीने या बेरोजगार तरूणांना चर्चगेट येथे एका इमारतीत कागदपत्रे घेऊन बोलावले. त्या कागदपत्रांची पडताळणी करून बनावट मुलाखत पत्रे दिली आणि प्रत्यक्ष मुलाखती घेऊन बनावट नेमणूक पत्रे देऊन त्यांची अक्षरशः फसवणूक केली. फसगत झालेल्या एका तरूणाने पोयनाड पोलीस ठाण्यात झाल्या घटनेची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपींविरोधात भा.दं.वि.कलम 420, 465, 468, 471 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. आव्हाड अधिक तपास करीत आहेत.
Check Also
पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …
RamPrahar – The Panvel Daily Paper