Breaking News

नोंदणी व व मुद्रांक विभागातील कमर्चार्‍यांचे आजपासून लेखणी बंद आंदोलन

पेण : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी 1 ऑक्टोबरपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील दुय्यम निबंधक कार्यालयात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे काम तसेच इतर कामे बंद राहणार आहेत
सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तत्काळ कराव्यात, मुद्रांक विभागातील सर्व कर्मचार्‍यांना जीवन सुरक्षा विमा कवच लागू करावे, तुकडेबंदी कायद्याने आणि रेरा कायद्यानुसार होणार्‍या कारवाईबाबत दखल घ्यावी, सह दुय्यम निबंधक वर्ग-2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 संवर्गाचे एकत्रिकरण व्हावे, हार्डवेअर व अन्य साहित्य मिळावे, आयकर विभागाचे विवरणपत्र, पोलीस विभाग व इतर विभागांकडून मागितली जाणारी माहिती, ई सरिता, ई-फेरफार, ग्रास व आधार सर्व्हर आदींची पूर्तता करावी यासह राज्य शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सोयीसुविधा पुरविण्यासाठी बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन खोत, कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण, सचिव सागर पवार यांनी दिली.
विविध मागण्यांबाबत राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लेखणी बंद आंदोलन करीत आहोत. यामुळे दस्त नोंदणीसह कार्यालयात कोणतेही कामकाज होणार नाही. नागरिकांनी याबाबत संघटनेला सहकार्य करावे, असे आवाहन पेणचे दुय्यम निबंधक संजय घोडजकर यांनी केले आहे.

Check Also

अटल सेतूजवळ ‌‘शिवमुद्रा‌’ आणि ‌‘शिवस्मारक‌’ उभारणार; मंत्री आशिष शेलारांसमवेत आमदार महेश बालदींची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या अटल सेतूजवळ रायगडच्या दिशेला असलेल्या एका मोठ्या खडकावर भव्य …

Leave a Reply